History

आणीबाणीबद्दल

आपण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासातील ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ या घटकावर लक्ष केंद्रीत केले होते. हा घटक आता अभ्यासाचा भाग असला, तरी स्वातंत्र्य युद्धाबद्दल जितकी माहिती व आकलन उमेदवारांकडे असते, तितके काही ते या नंतरच्या भागावर नसते, असे आढळून येते.

दुसरे स्वातंत्र्ययुद्ध
आणीबाणी हा स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात वादग्रस्त कालखंड. या घटनेने नुकतीच आपली चाळीशी पूर्ण केली आहे. शत्रूशी लढताना आलेला पराभवही एकवेळ सहन करता येतो, पण आपल्याच लोकांशी लढून मिळवलेला विजयदेखील साजरा करता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे की, आणीबाणीच्या कालखंडाचा विसर पडता कामा नये. नक्कीच हा इशारा विरोधकांना व खुद्द सत्ताधीशांनाही लागू होतो. आणीबाणीने भारतीय लोकशाहीला ताणून बघितले, राज्यघटना, त्याची तत्त्वे व त्यांचा अर्थ हे सर्व पणाला लावले. पण या कसोटीच्या कालखंडातून भारतीय लोकशाही तावून-सुलाखून निघाली व अजून मजबूत झाली. एकप्रकारचे हे दुसरे स्वातंत्र्ययुद्ध होते.

अमृतमंथन
भारतीय स्वातंत्र्यलढा ही एक लखलखती सुवर्णरेखा होती. त्या लढ्याने काही आदर्श घालून दिले. त्या आदर्शांच्या रस्त्याने चालण्याचे आव्हान स्वातंत्र्यानंतर होते. लवकरच आदर्शांचा हा बर्फ वितळायला लागला. वास्तवाच्या आगीचे चटके बसायला लागले. महात्मा गांधींना भिंतीवर लटकावून एक काळ गेला. जो काही उरलासुरला आदर्शवाद होता, त्याचा बळी आणीबाणीच्या कालखंडात गेला. एक चक्र पूर्ण झाले. अर्थात अधःपतनाची एक पायरी गाठून लोकशाही व राज्यघटना नव्याने वर आले व भारतात लोकशाही टिकणार, हे अमृत या सर्व घुसळणीतून बाहेर पडले.

मूल्ये ऐरणीवर
सर्व मूल्ये ऐरणीवर लागली असताना जे या प्रसंगातही आपल्या मूल्यांवर ठाम राहिले, ते राजकारणात पुढे गेले. तर ज्यांनी मान सत्तेपुढे झुकवली व जनतेशी विश्वासघात करून नेत्यावर आपल्या निष्ठा वाहिल्या ते पुढे जनतेच्या मनातून उतरले. या कालखंडात राजकारणात उतरलेली तरुण पिढी आज राजकारणाच्या शीर्षस्थानी आहे. उदा. नरेंद्र मोदी, नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, सुब्रमण्यम स्वामी, शरद यादव इत्यादी. आणीबाणीत ज्या प्रकारची घुसळण भारतीय राजकारणात घडवून आणली, तिची तुलना माओने चीनमध्ये मूल्यांच्या पुनर्स्थापनेसाठी घडवून आणलेल्या ‘सांस्कृतिक क्रांती’शी करता येईल.

फ्लॅशबॅक
मार्च १९७७: असे वाटत होते की, आणीबाणीचा हा काळ कधीच संपणार नाही. मात्र अचानक विरोधी पक्षातील नेत्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. सर्व बाहेर आले, तरी आपण किती काळ मुक्त राहणार, याबद्दल ते सांशक होते. पुन्हा कधीही तुरुंगात टाकले जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. तरीही दिल्लीत मोठी जनसभा आयोजित करण्यात आली. सभेला लोक येऊ नयेत, म्हणून सरकारने त्याकाळचा लोकप्रिय सिनेमा ‘बॉबी’ दूरदर्शनवर त्याचवेळी दाखवला. तरीही अटलबिहारी वाजपेयी यांचे अमोघ भाषण ऐकण्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदान लोकांनी खचाखच भरले होते.

वाजपेयी यांनी स्वतःचीच कविता म्हटली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे रात्री अकरापर्यंत टाळया पडतच गेल्या. वाजपेयी यांच्या त्या चार ओळी होत्या- 

बाद मुद्दत के मिले है दिवाने

कहने सुनने को, बहोत है

अफसाने खुली हवा मैं जरा

सांस तो लेले कब तक रहेगी आझादी, कौन जाने

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------