History

१८५७ राष्ट्रीय उठाव व कारणे

सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे. १८५७ साली झालेला उठाव हा इंग्रजांविरुध्द भारतात झालेला पहिला उठाव नव्हता, त्यापूर्वीही इंग्रजांविरुध्द अनेक उठाव झाले होते.

इसवी सन १८५७ मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्ययुध्द म्हणून ओळखले जाते. लक्षावधी सैनिक, कारागीर आणि शेतकरी एकत्र आले त्यांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुटीने प्रयत्न केला. पण हा उठाव काही एकाएकी घडून आलेला नव्हता. ब्रिटिशांची नीती व साम्राज्यवादी पिळवणूक याविरुध्द त्यापूर्वीच्या शंभर वर्षाहून अधिककाळ जो असंतोष होता त्याचाच परिपाक या उठावाच्या रुपाने झाला. ब्रिटिशांनी भारत जिंकली व एका प्रदीर्घ प्रक्रियेअंती येथील अर्थव्यवस्था, आणि समाज यांचे वसाहतीकरण करुन टाकले. या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, निष्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणि पराजित भारतीय संस्थानांतील पदाधिकारी यांनी अनेक वेळा अंतर्गत उठाव केले. शेती भाती नष्ट झाल्याने शेतकरी, परंपरागत बलुतेदारी नष्ट झाल्याने ज्यांचा व्यवसायच गेला असे कारागीर आणि लष्कारातून सेवामुक्त केलेले सैनिक या बंडाच्या पाठीशी होते. १७६०-७० च्या दरम्यान झालेल्या बंगालमधील संन्याशी बंड, बिहारमधील चुआर उठाव यांनी प्रारंभ होऊन नंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी ब्रिटिश सत्तेशी कोठेना कोठे लष्करी संघर्ष होत आलेला आहे. देशाच्या कोठल्या ना कोठल्या भागात लष्करी बंड झाले नाही असे एकही दशक गेले नाही. शेकडो किरकोळ संघर्ष बाजूला ठेवली तरी १७६३ ते १८६ च्या दरम्यान किमान ४० मोठे लष्करी संघर्ष झाले होते. त्यात जनतेचा सहभाग मोठा असला तरी त्यांचे स्वरूप व परिणाम स्थानिकच होते आणि हे उठाव एकमेकांपासून अगदी अलग होते.

१८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दांत मात्र देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग होता व त्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला.

१८५७ पूर्वीचे लढे :

  1. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापना झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढे दिले.

  2. शेतकरी, कारागीर, आदिवासी, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे लढे दिले.
  3. सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. असे लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले.
  4. छोटा नागपूर परिसरातील कोलाम, उडीसातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले.
  5. महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले.
  6. इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनीदेखील आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी लढे दिले. त्यापैकी १८०६ सालच्या वेल्लोर तसेच १८२४ सालचा बराकपूर येथील दोन्ही लढे विशेष उग्र स्वरूपाचे होते.
  7. इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्वं लढे स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले. परंतु त्यामुळे लोकांमधील असंतोष फक्त दडपला गेला. तो नाहीसा झाला नाही, मात्र जनतेतील असंतोषाचा वणवा १८५७ मध्ये भडकला.

१८५७ च्या उठावाची कारणे :

राजकीय कारणे :-

  1. इ.स. १६०० मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया स्थापना झाली.
  2. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने राजकीय परिस्थितीचे निरीक्षण केले. छोटी राज्ये त्याच्यातील वैर, राज्यातील गैर कारभार , मागासलेले शस्त्रास्त्रे त्याच्यातील राष्ट्रीयत्वाचा अभाव इ. गोष्टीमुळे राज्य निर्माण करणे सहज शक्य आहे.
  3. इ. स. १७५७ च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटीश सत्तेचा पाया भारतात रचला गेला.
  4. लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी प्रचंड सत्त्ताविस्तार करून सर्वं देश भर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.
  5. इ.स. १७९८ मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
  6. तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करुन साम्राज्य विस्तारावर भर दिला
  7. वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आविला व अनेक संस्थाने बरखास्त केली.
  8. मुत्सद्देगिरी, भेदनीती, साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखता आला नाही.
  9. लॉर्ड डलहौसी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्या.
  10. मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला.
  11. पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्तक पुत्र नानासाहेब यांना मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली.

आर्थिक कारणे :

  1. ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.
  2. 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.
  3. सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली.
  4. येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल हिंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता.
  5. शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. शेतऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.
  6. दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसाऱ्यामध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले.

धार्मिक कारणे :

  1. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आर्थिक साम्राज्यावादा बरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला.

  2. इ.स. 1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
  3. अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.
  4. कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली.
  5. यामुळे धर्मगुरु व मौलवंशीची अप्रतिष्ठा झाली.
  6. यामुळे धार्मिक असंतोष वाढीस लागला.

लष्करी कारणे :

  1. राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असला. तरी जोपर्यंत शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते.

  2. शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.
  3. ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले. इ.स. 1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.
  4. भारतीय सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास आपला धर्म बुडेल अशी समजूत होती.
  5. र्लॉड कॅनिंगने सामान्य सेवा भरती अधिनियम पास केला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जाणार होते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------